आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट
एक लहान मूल जेव्हा हळूहळू वाढत असते पहिल्यांदा पालथे पडायला शिकते, नंतर हळूहळू रांगायला शिकते, काही महिन्याचे झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहायचा प्रयत्न करते आणि उभे राहिल्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या बोटाला धरून चालायला शिकते. एका नवजात शिशुला सर्वात प्रथम स्वतःच्या पायावर उभे राहून चालायला शिकवतात ते त्याचे आई-बाबा! बोटाला धरून संपूर्ण जग दाखवतात ते त्याचे आई-बाबा!
पण जर एखाद्या निरागस मुलाला किंवा मुलीला जग दाखवण्यासाठी बोट धरून चालवण्यासाठी त्याचे आई-बाबाच नसतील? तर खरंच कल्पना करवत नाही..! त्यातही जर ती मुलगी असेल तर तिला स्वतःचे वडील सर्वात प्रिय असतात. पण पाठीवरती हात ठेवून शाबासकी द्यायला पालकच नसतील तर ती मुलगी किती हालअपेष्टा सोसत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही...
लहानपणी आई-वडिलांच्या मायेचे छत्र हरवल्यामुळे आयुष्यात आलेल्या अनेक काटेरी प्रसंगावर मात करून उद्योग विश्वामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारे नाव म्हणजेच श्री. दत्तात्रय जगताप! लहानपणापासून आई-वडील नसल्याने त्यांचे संगोपन आजी व मावशीने केले. जर एक मुलगी सक्षम बनली तर ती संपूर्ण घराची जबाबदारी घेऊ शकते असे लक्षात आल्यावर स्वतःला झालेल्या वेदना पुन्हा कोणाच्या आयुष्यात येऊ नये म्हणून निराधार मुलींसाठी ज्यांची दोन्ही पालक किंवा एक पालक नसलेल्या मुलींसाठी ‘आपण स्वतःहून काही केले पाहिजे' या संकल्पनेतून श्री दत्तात्रय जगताप यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंतीचे औचित्य साधून “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची स्थापना 3 जानेवारी 2023 रोजी केली.
पालक नसलेल्या इयत्ता पाचवी ते दहावी मधील मुलींसाठी आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत असून श्री. दत्तात्रय जगताप व सौ. रूपाली जगताप हे प्रथम सेवक म्हणून कार्य करतात. फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींचा मानसिक- शारीरिक- सामाजिक असा सर्वांगीण विकास व्हावा व शिक्षण घेऊन प्रत्येक मुलगी ही सशक्त व्हावी हेच उद्दिष्ट “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” चे आहे. फाउंडेशन तर्फे अनेक शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य, मुलींच्या नावाची “मी लेक सावित्रीची” अशा आशयाची फोटो फ्रेम व भक्कम पाठिंबा देऊन प्रत्येक मुलीला सक्षम बनवले जाते.
श्री दत्तात्रय जगताप यांनी स्वतःचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” ची सुरुवात केली. एका छोट्या गावातील मोजक्या शाळेपासून सुरुवात करून 2025 पर्यंत सातारा जिल्ह्यातील 50 हुन अधिक शिक्षण संस्था मधील 300 हुन अधिक शाळांमध्ये तसेच 3000 पेक्षा जास्त मुलींना मदत केली आहे. “आशा फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट” तर्फे महाराष्ट्र राज्यातील किमान दोन लाख मुलींना जानेवारी 2030 पर्यंत मदत करून सक्षम बनवण्याची ध्येय आहे ईश्वराच्या आशीर्वादाने व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने हे ध्येय साकार करू.